G-PZND2NBDJ8
श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग : संपर्क ७३८७९९४४११ ... Shri Khandoba Devasthan, Andur-Naldurg: Contact 7387994411

नळदुर्गच्या श्री खंडोबा देवाची यात्रा २ जानेवारीपासून...


 नळदुर्ग - तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग (मैलारपूर) येथील जागृत देवस्थान श्री खंडोबा देवाचा यात्रोत्सव २ ते ४ जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषात आणि उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्याने नळदुर्ग परिसर सुवर्णमयी होण्यासाठी सज्ज झाला असून, या यात्रेसाठी सुमारे ५ ते ७ लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

धार्मिक महत्त्व आणि परंपरा

श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून महाराष्ट्रातील खंडोबाच्या एकूण १२ स्थानांपैकी नळदुर्गचे मैलारपूर हे दुसरे प्रमुख स्थान मानले जाते. विशेष म्हणजे श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह याच पवित्र ठिकाणी झाला, अशी आख्यायिका आहे. मागील दीड महिन्यांपासून येथे यात्रोत्सव सुरू असून,  पौष पौर्णिमेच्या यात्रेने या उत्सवाची सांगता होणार आहे.

३ जानेवारीला यात्रेचा मुख्य दिवस

यात्रेचा मुख्य दिवस शनिवार , ३ जानेवारी रोजी असणार आहे. या दिवशी पहाटे देवाचा अभिषेक आणि महापूजा संपन्न होईल. दिवसभर भाविकांचे नवस फेडण्याचे कार्यक्रम, तसेच पारंपरिक वाघ्या-मुरळी नृत्य सादर केले जातील. यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध गावांमधून येणाऱ्या जवळपास सातशे नंदीध्वज (काठ्या).

मध्यरात्रीचा नयनरम्य सोहळा

३ जानेवारीच्या रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अणदूर आणि नळदुर्ग येथील मानाच्या काठ्यांचे आगमन मंदिरात होईल. यावेळी होणारी आतषबाजी आणि शोभेच्या दारूचे काम पाहण्यासारखे असते. दोन्ही गावांच्या मानकऱ्यांचा  सत्कार आणि वाजतगाजत निघणारा छबिना याने यात्रेची सांगता होईल. भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेले भक्तगण हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य असते.

प्रशासकीय सज्जता

भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थांनकडून दर्शन बारीची (रांग) व्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रा यशस्वी आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मंदिर समिती, यात्रा कमिटी आणि नळदुर्ग नगरपरिषद अहोरात्र मेहनत घेत आहेत.

 

अणदूर येथील श्री खंडोबा यात्रा २१ नोव्हेंबरला; 'गावे दोन, मंदिर दोन, देव एक' अशी अनोखी परंपरा

 २२ नोव्हेंबर रोजी श्री खंडोबाचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान; देवस्थान समितीकडून जय्यत तयारी



तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा देवाची प्रसिद्ध यात्रा येत्या २१ नोव्हेंबर रोजी भरणार आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, श्री खंडोबा देवस्थान समिती आणि यात्रा कमिटीने यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी अणदूर येथे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील. यामध्ये श्री खंडोबाची महापूजा आणि रात्री छबीना मिरवणूक काढण्यात येणार आहे.


या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 'गावे दोन, मंदिर दोन आणि देव एक' ही अनोखी परंपरा. श्री खंडोबाच्या मूर्तीचे वास्तव्य अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूर (नळदुर्ग) येथील मंदिरात पावणे दोन महिने असते. या परंपरेनुसार, यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २२ नोव्हेंबर रोजी, श्री खंडोबाचे आगमन मैलारपूर (नळदुर्ग) येथील मंदिरात होणार आहे.


देवाच्या मूर्तीचे स्थलांतर करण्यापूर्वी अणदूर आणि नळदुर्ग या दोन्ही गावांतील मानकरी मंडळींमध्ये रीतसर लेखी करार केला जातो. त्यानंतरच देवाच्या मूर्तीला पालखीमध्ये विराजमान करून वाजत गाजत नळदुर्गकडे नेले जाते.


मैलारपूर (नळदुर्ग)  हे स्थळ श्री खंडोबा आणि बाणाई यांचे विवाह स्थळ म्हणून ओळखले जाते. येथील मंदिरात चंपाषष्टी यात्रा आणि पौष पौर्णिमा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या दोन्ही यात्रा उत्सवांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधून असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात.

श्री खंडोबा: दोन मंदिरे, एक मूर्ती, अतूट भक्ती - एक अनोखी परंपरा



महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यात, अणदूर आणि नळदुर्ग या दोन गावांमध्ये, एक अशी अनोखी परंपरा जिवंत आहे जी केवळ धार्मिक श्रद्धेचेच नव्हे तर सामाजिक ऐक्य आणि सहिष्णुतेचेही एक अद्वितीय उदाहरण मांडते. ही परंपरा आहे श्री खंडोबा, महादेवाचा अवतार मानल्या जाणाऱ्या दैवताची, ज्यांची एकच मूर्ती दोन मंदिरांमध्ये वर्षभर विभागून ठेवली जाते. 

नळदुर्ग ते अणदूर: ऐतिहासिक प्रवास

श्री खंडोबाची ही कथा नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यापासून सुरू होते, जिथे त्यांची स्वयंभू मूर्ती सापडली असे मानले जाते. नळ-राजा आणि त्यांची पत्नी दमयंती यांच्या अतूट भक्तीने प्रसन्न होऊन, श्री खंडोबा या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी नळदुर्ग किल्ल्यात  बानूबाईशी दुसरा विवाह केला, अशी आख्यायिका आहे. 

इतिहासात अनेक उलथापालथी झाल्या. इब्राहिम आदिलशहाने किल्ल्यातील मंदिरावर उपली बुरुज बांधला, नंतर मंदिर बोरी नदी काठी बांधण्यात आले , येथेही  निजामशाहीत मंदिरात गाय कापली गेली, अशा घटनांमुळे मूर्तीचे स्थलांतर होत राहिले. अखेर, ही मूर्ती अणदूर येथे आणण्यात आली. या मंदिराला छत्रपती शाहू महाराजांनी जमीन दिली, तर अहिल्यादेवी होळकर यांनी सभामंडप बांधला. अशा प्रकारे, अणदूर हे गाव श्री खंडोबाच्या भक्तीचे प्रमुख केंद्र बनले.

देवाचा करार: एकमेव उदाहरण

अणदूरमध्ये मंदिर स्थिरावल्यानंतरही, नळदुर्गच्या लोकांनी आपला देव म्हणून दावा सोडला नाही. यातून निर्माण झालेल्या वादाचे निराकरण करण्यासाठी दोन्ही गावांनी एक अभूतपूर्व करार केला - देवाचा करार. या करारानुसार, श्री खंडोबाची मूर्ती वर्षातील सव्वा दहा महिने अणदूरमध्ये आणि उर्वरित पावणे दोन महिने नळदुर्गच्या मैलारपूर येथे राहते. दोन्ही गावात चार किलोमीटर अंतर आहे. 

यात्रा: श्रद्धेचा समुद्र

मूर्तीचे हे स्थलांतर केवळ एक औपचारिकता नसून, एक भव्य उत्सव असतो. दोन्ही गावांतून पालखीतून वाजत-गाजत मिरवणुका निघतात, ज्यात अनेक भाविक सहभागी होतात. यावेळी, दोन्ही गावांचे मानकरी एकमेकांशी लेखी करार करतात, जो 'देवाचा करार' म्हणून ओळखला जातो. असा अनोखा करार जगात कुठेही पाहायला मिळत नाही.

अणदूरची यात्रा यावर्षी  २ डिसेंबर रोजी आहे , त्यानंतर मूर्ती मैलारपूरला नेली जाते. या दरम्यान  दर रविवारी किमान ५० हजार भाविक येतात, तर पौष पौर्णिमेला ही संख्या ५ लाखांपर्यंत पोहोचते. यात्रेत ७०० हून अधिक नंदीध्वज (काठ्या) सहभागी होतात . या यात्रांमध्ये नंदीध्वजांचे नाच, वारूंचे बेधुंद नाच, अभिषेक, नेवेद्य इत्यादी अनेक धार्मिक विधी आणि परंपरा पाळल्या जातात.

श्रद्धा आणि ऐक्य

श्री खंडोबाची ही अनोखी परंपरा केवळ धार्मिक श्रद्धेचेच नव्हे तर सामाजिक ऐक्य आणि सहिष्णुतेचेही एक ज्वलंत उदाहरण आहे. दोन गावांमधील हा देवाचा करार, परस्पर आदर आणि समंजसपणाच्या भावनेला बळकटी देतो. ही परंपरा आपल्याला शिकवते की, श्रद्धा आणि भक्ती या सीमा ओलांडून एकात्मतेची भावना निर्माण करू शकतात. श्री खंडोबाची ही अनोखी परंपरा आजही जिवंत आहे आणि भाविकांच्या हृदयात श्रद्धेचा अखंड दीप तेवत आहे. 

- सुनील ढेपे, सचिव , श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग 

मो - ७३८७९९४४११



अणदूरची श्रावण परंपरा: खडी रविवारचा अनोखा उपवास

 



श्रावण महिना हा भगवान शिवाच्या भक्तीचा महिना. या पवित्र महिन्यात देशभरात श्रावण सोमवारचे व्रत केले जाते, पण धाराशिव जिल्ह्यातील अणदूर गावात मात्र श्रावण महिन्याच्या शेवटच्या दोन रविवारांना 'खडी रविवार' हा अनोखा उपवास केला जातो. ही परंपरा येथील श्री खंडोबाच्या देवस्थानाशी निगडीत आहे.


अणदूर हे गाव श्री खंडोबाचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असल्याने श्रावण महिन्यात येथे खंडोबाची विशेष पूजा-अर्चना केली जाते. दोन पुजारी चार किलोमीटर अंतरावरून चालत कावडीने पाणी आणतात आणि त्याच पाण्याने देवाला अभिषेक केला जातो. महिनाभर पौराणिक कथावाचन आणि रात्रीच्या पूजेत १०१ बिल्व पत्र अर्पण करण्याची प्रथा आहे. एका सोमवारी गावातील सर्व महादेव मंदिरांना वाद्य वाजवत जाऊन अभिषेक केला जातो.


या सर्व परंपरांमध्ये 'खडी रविवार' हा उपवास विशेष स्थानिक महत्त्व राखतो. श्री खंडोबाची दररोज दोन वेळा पूजा केली जाते. सकाळी ९ वाजता पूजा झाल्यावर दिवसभर उभे राहण्याची आणि रात्री १० वाजता पूजा होईपर्यंत बसण्याची परवानगी नाही, ही प्रथा आहे. तसेच रात्रीची पूजा झाल्याशिवाय जेवण करायचे नाही. हा कडक उपवास श्रावण महिन्याच्या शेवटच्या दोन रविवारी अणदूर येथील पुजारी समाजातील लोक आणि गावातील असंख्य भाविक करतात. 


श्रावण महिन्यात खडी रविवारचा उपवास करण्यामागची नेमकी कथा उपलब्ध नाही, पण ही परंपरा अणदूरच्या श्रावण महिन्याच्या उत्साहाला आणि भक्तीला एक वेगळे परिमाण देते. या अनोख्या परंपरेमुळे अणदूरमध्ये श्रावण महिना हा केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वपूर्ण ठरतो. 

 सुनील ढेपे, सचिव , श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग 

मो - ७३८७९९४४११

अणदूर ते नागझरी: एक अतूट श्रद्धेची परंपरा

 


अणदूरचे श्री खंडोबा मंदिर हे केवळ एक जागृत देवस्थान म्हणूनच नव्हे, तर एक अतूट श्रद्धेच्या आणि परंपरेच्या प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराची ख्याती केवळ श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असल्यामुळेच नाही, तर येथे जपल्या जाणाऱ्या अनेक विधिपूर्वक परंपरांमुळेही आहे. त्यांपैकी एक म्हणजे श्रावण महिन्यात श्री खंडोबांना नागझरी येथील होमकुंडातील पाण्याने अभिषेक करण्याची प्रथा.


नागझरी हे मैलारपूर (नळदुर्ग) श्री खंडोबा मंदिराजवळच असलेल्या एका डोंगरात वसलेले आहे. येथील होमकुंडातील पाणी वर्षभर गरम राहते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या कुंडाचे पाणी १९७२ च्या भीषण दुष्काळातही आटले नव्हते, ही बाब या श्रद्धेला आणखी बळकटी देते.


अणदूरहून नागझरी हे अंतर जवळपास चार किलोमीटर आहे, नागझरीहून मैलारपूर (नळदुर्ग ) आणि नंतर अणदूर अशा प्रकारे, अणदूरच्या पुजारी रोहित बाळू मोकाशे आणि शुभम महेश मोकाशे  दररोज एकूण नऊ ते दहा किलोमीटर अंतर चालून कापतात. श्रावण महिन्याच्या प्रत्येक पहाटे, ते पाऊस-वाऱ्याची पर्वा न करता ही यात्रा करतात. त्यांच्या खांद्यावर कावड असते आणि त्या कावडीवर प्रत्येकी दोन अश्या एकूण चार घागरी असतात.


मैलारपूर (नळदुर्ग ) हून एकदा कावड हाती घेतली की ती खाली टेकवू नये, असाही एक कडक नियम आहे. या नियमामुळे ही यात्रा आणखीनच आव्हानात्मक बनते. तरीही, हे पुजारी अविरतपणे, श्रद्धेने आणि समर्पणाने ही परंपरा जपत आहेत. ते नागझरी येथे पोहोचतात, स्नान करतात आणि मग होमकुंडातील पाणी घागरीत भरतात. 


यानंतर हे पुजारी मैलारपूर (नळदुर्ग) श्री खंडोबा मंदिराकडे जातात. तेथे एक घागर महादेवाला अर्पण केली जाते आणि एका रिकाम्या घागरीत जवळच्या नदीचे पाणी भरून ते परत येतात. संपूर्ण श्रावण महिना हा त्यांचा दिनक्रम असाच चालू राहतो.


आजच्या सुपरफास्ट युगातही, जिथे प्रत्येक गोष्ट जलदगतीने होते, तिथे ही परंपरा अजूनही कायम आहे. चालत जाऊन, घागरींमध्ये पाणी आणण्याची ही पद्धत, आणि त्यातही कावड खाली न टेकवण्याचा नियम, हे केवळ एक धार्मिक विधी नसून, ती एक निष्ठा, श्रद्धा आणि परंपरेचे जतन करण्याचा एक मार्ग आहे.

आज नागपंचमीच्या निमित्ताने, आपण या परंपरेला आणि त्यामागील भक्तीभावाला  वंदन करूया. 


- सुनील ढेपे, सचिव , श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग 

मो - ७३८७९९४४११

अणदूरच्या श्री खंडोबाचे सिंहासन चांदीचे होणार

नाशिकचे कारागीर परेश कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी दीड महिन्यात काम पूर्ण करणार 


अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबाचे सिंहासन बदलण्यात आले असून, हे सिंहासन चांदीचे करण्यात येत आहे. त्यासाठी ३५ किलो चांदी लागणार असून २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम नाशिकचे कारागीर परेश कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी करणार आहेत. 


श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळामुळे अणदूर येथील श्री खंडोबा तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. या खंडोबाच्या दर्शनासाठी  संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधील भाविक दररोज येत असतात. हे मंदिर पुरातन असून साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. 


या मंदिरातील पुरातन सिंहासन पितळी होते, त्याची काही प्रमाणात झीज झाल्याने ते काढून सागवानमध्ये सिंहासन तयार करण्यात आले आहे. त्यावर आता चांदीने बसवण्यात  येणार असून , सुंदर नक्षीकाम देखील करण्यात येणार आहे. या कामासाठी ३५ किलो चांदी लागणार असून २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम नाशिकचे कारागीर परेश कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी करणार आहेत. दीड महिन्यात हे  काम पूर्ण करणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. 




 परेश कुलकर्णी यांना सोमवारी या कामाचे कंत्राट देण्यात आले , यावेळी  मंदिर समितीच्या वतीने उपाध्यक्ष अविनाश मोकाशे यांच्या हस्ते कुलकर्णी यांचा सत्कार करणात आला. यावेळी अध्यक्ष बालाजी मोकाशे, सचिव सुनील ढेपे, सदस्य दीपक मोकाशे, बाळू येळकोटे, महादेव खापरे आदी उपस्थित होते. 



ज्या भाविकांना या पुण्यकामास आर्थिक मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी श्री खंडोबा देवस्थान,एसबीआय  बँक खाते नंबर - 11507329802  IFS Code SBIN0003404 यावर रक्कम जमा करावी, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने सचिव सुनील ढेपे यांनी केले आहे.  




श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी बालाजी मोकाशे

सचिवपदी सुनील ढेपे यांची फेरनिवड 




अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर - नळदुर्ग ( मैलारपूर ) येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी बालाजी मोकाशे, उपाध्यक्षपदी अविनाश मोकाशे यांची नव्याने तर सचिवपदी सुनील ढेपे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. 

अणदूर - नळदुर्ग ( मैलारपूर ) येथील श्री  खंडोबा हे जागृत देवस्थान असून, श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळामुळे राज्यात प्रसिद्ध आहे.  श्री खंडोबाच्या दर्शनासाठी  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश . तेलंगणा येथील हजारो भाविक दर्शनासाठी दरवर्षी येत असतात. 

१० वर्षानंतर श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी बदलेले आहेत. सचिव सुनील ढेपे वगळता अन्य आठ सदस्य नवीन घेण्यात आले आहेत. मावळते अध्यक्ष प्रकाश मोकाशे यांनी नव्या पदाधिकाऱ्याकडे कार्यभार सोपवला. 

नवीन पदाधिकारी असे : अध्यक्ष -  बालाजी  सुधाकर मोकाशे , उपाध्यक्ष  - अविनाश दिलीप मोकाशे , सचिव  - सुनील मधुकर ढेपे 

सदस्य -  महेश विठ्ठल  मोकाशे,  शशिकांत यादव मोकाशे , दिपक अशोक मोकाशे ,महादेव गंगाधर मोकाशे , अमोल रमेश मोकाशे , सदानंद खंडेराव येळकोटे. 


स्वर्गाची सुंदरी, नवरी नटली नंतर राहुल शिंदेचं आलं अणदूर - नळदुर्गच्या खंडोबावर लोकप्रिय गाणं




उस्मानाबाद  - स्वर्गाची सुंदरी, नवरी नटली , पुण्याचा राघू आदी लोकप्रिय गाणे गाणाऱ्या गायक राहुल शिंदे यांचं  खंडोबावर नवीन दमदार गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर आणि नळदुर्गच्या  श्री खंडोबा आख्यायिकेवर पत्रकार सुनील ढेपे यांनी  हे गाणं लिहिले आहे. 

अणदूर आणि नळदुर्ग हे दोन वेगवेगळे गावे असली तरी श्री खंडोबाची मूर्ती एकच आहे. अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावणे दोन महिने श्री खंडोबाचे वास्तव असते. श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह याच ठिकाणी झाला आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राला अनन्य साधारण महत्व आहे. 

याच खंडोबा आख्यायिकेवर पत्रकार सुनील ढेपे यांनी 'बघा माझा खंडोबा कसा डोलतो' हे  भक्तीगीत लिहिले असून, गायक राहुल शिंदे यांनी आपल्या दमदार आवाजात हे गायलं आहे.सहगायक म्हणून शाहीर बापु पवार आणि सचिन अवघडे यांनी भाग घेतला आहे. उस्मानाबाद लाइव्ह आणि मुक्तरंग म्युझिक चॅनलने हे गाणं रिलीज केले आहे. 

अणदूरच्या श्री खंडोबाची यात्रा ५ डिसेंबर रोजी आहे. त्यानंतर श्री खंडोबाचे नळदुर्गमध्ये आगमन होते, त्यानंतर दर रविवारी यात्रा तर पौष पौर्णिमेला महायात्रा भरते , दर रविवारच्या यात्रेला किमान २० ते ३० हजार भाविक आणि महायात्रेला ५ लाख भाविक येत असतात. कोरोनामुळे दोन वर्षे यात्रा झाली नसली तरी यंदा यात्रा नेहमीप्रमाणे भरण्याची शक्यता आहे. 

युट्युब लिंक 



अणदूर - नळदुर्गचे खंडोबा मंदिर दर रविवारी बंद




अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर - नळदुर्गचे श्री खंडोबा  मंदिर यापुढे  दर रविवारी बंद राहणार आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांनी पुढील आदेश येईपर्यंत रविवारी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन  मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 


कोरोना रुग्णाची संख्या वाढल्यामुळे  उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच दर रविवारी मंदिरे आणि  प्रार्थनास्थळेही  बंद राहणार आहेत, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अणदूर - नळदुर्गचे  श्री खंडोबा मंदिर दर रविवारी बंद  ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. 


अणदूर - नळदुर्गचे श्री खंडोबा मंदिर  जागृत देवस्थान असल्याने दर रविवारी दोन्ही ठिकाणी भाविकांची  मोठी गर्दी असते. भाविकांनी यापुढे पुढील आदेश येईपर्यंत दर रविवारी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी केले आहे. 

कोरोनाचा फटका : नळदुर्गच्या श्री खंडोबाची महायात्रा रद्द




नळदुर्ग : अणदूर पाठोपाठ नळदुर्गच्या श्री खंडोबा यात्रेला कोरोना महामारीचा फटका बसला आहे. २७ ते २९ जानेवारी रोजी भरणारी महायात्रा रद्द करण्यात आली आहे. या तिन्ही दिवशी मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार  आहे, मात्र प्रमुख मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत. 


 मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा असंख्य लोकांचे कुलदैवत आहे. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यातून किमान पाच ते सात लाख भाविक यात्रेसाठी हजेरी लावत असतात. श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळ असल्यामुळे आणि जवळच भुईकोट किल्ला असल्यामुळे यात्रेला मोठी गर्दी असते. 


यंदाची यात्रा दि. २७ ते २९ जानेवारी रोजी भरणार होती. २८ जानेवारी रोजी छबिना निघणार होता. २९ जानेवारी रोजी कुस्तीचा फड रंगणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे तसेच कुस्त्या होणार नाहीत. आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच यात्रा रद्द करण्यात आली आहे. 


२७ ते २९ जानेवारी दरम्यान   मैलारपूर  मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. तसेच व्यवसायीकांना दुकान लावण्यास मनाई करण्यात येणार आहे. याबाबत रविवारी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत नियमावली वाचून दाखवण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी , आरोग्य विभाग, नगर पालिका कर्मचारी, मानकरी, पुजारी, लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 


धार्मिक विधी पार पडणार 


कोरोना महामारीमुळे महायात्रा रद्द करण्यात आली असली तरी सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.  २७ ते  २९ जानेवारी हे तीन मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.नळदुर्ग व अणदुरच्या प्रत्येकी पंचवीस मानक-यांना या काळात पारंपरिक विधी करण्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. यावेळी मैलारपूर मंदिराकडे येणारे सर्व रस्ते भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहेत. बाहेर गावच्या भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे,  असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

Read More

https://osmanabadlive.com/breaking-news/coronas-blow-shri-khandobas-mahayatra-of-naldurg-canceled/cid2080221.htm

अणदूर खंडोबा मंदिराची छायाचित्रे











कोरोनाचा फटका : अणदूरच्या श्री खंडोबा यात्रेवर बंदी

प्रथेप्रमाणे ५० लोकांच्या उपस्थितीमध्ये मूर्ती नळदुर्गला जाणार 






अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा यात्रेला यंदा कोरोनाचा फटका बसला आहे.  १५ डिसेंबर रोजी होणारी यात्रा  रद्द करण्यात आली आहे. मात्र प्रथेप्रमाणे श्री खंडोबाची मूर्ती ५० लोकांच्या उपस्थितीमध्ये  नळदुर्गला नेण्यात येणार आहे. 


अणदूर आणि नळदुर्ग मध्ये श्री खंडोबाचे दोन वेगवेगळे मंदिर असून, श्री खंडोबाची मूर्ती अणदूर येथे सव्वा दहा महिने तर नळदुर्ग येथे पावणे दोन महिने असते.गेल्या सातशे वर्षापासून ही रूढी - परंपरा सुरु आहे. अणदूरची यात्रा झाली मूर्ती नळदुर्गला नेली जाते. यंदा १५ डिसेंबर रोजी अणदूरची यात्रा होती. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अणदूरची  यात्रा रद्द करण्यात आली आहे. अणदूर आणि नळदुर्गचे  प्रमुख मानकरी, विश्वस्त मंडळ, पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये लेखी करार करून मूर्ती नळदुर्गला नेण्यात येणार आहे, मात्र यात्रा होणार नाही., असे प्रशासनाने कळविले आहे. 


मंदिर परिसरात प्रासादिक भांडार दुकाने लावण्यास तसेच  हॉटेल, खेळणी दुकाने , पाळणे लावण्यास बंदी  घालण्यात आली आहे. यादिवशी भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. 


नळदुर्गच्या मंदिराची रंगरंगोटी सुरु 


श्री खंडोबाचे १६ डिसेंबर रोजी पहाटे नळदुर्गच्या  श्री खंडोबा मंदिरात  आगमन होणार आहे. या मंदिराची सध्या  रंगरंगोटी सुरु असून त्याचे काम अंतिम टप्पात आहे. 


श्री खंडोबाचे अणदूरहुन नळदुर्गमध्ये आगमन

नळदुर्ग: अणदूरची यात्रा पार पडल्यानंतर  श्री खंडोबाच्या मूर्तीचे अणदूर येथील मंदिरातून नळदुर्ग (मैलारपूर) येथील मंदिरात गुरुवारी (ता.28) पहाटे चार वाजता वाजत-गाजत पालखीतून आगमन झाले. यावेळी मूर्ती देवाणघेवाणीबाबत नळदुर्गचे मानकरी व अणदूरचे मानकरी यांच्यामध्ये पूर्वापार चालत आलेला लेखी करार झाला. नळदुर्गकरांनी मैलारपूर मंदिर मार्गावर आकर्षक रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या.

अणदूर आणि नळदुर्ग ही दोन वेगवेगळी गावे असून, दोन्ही गावात चार किलोमीटर अंतर आहे. या दोन्ही गावात श्री खंडोबाची मंदिरे असली तरी मूर्ती मात्र एकच आहे. श्री खंडोबाची मूर्ती अणदूर येथे सव्वा दहा महिने तर नळदुर्ग येथे पावणे दोन महिने असते. अणदूरहुन नळदुर्गला आणि नळदुर्गहुन अणदूरला मूर्ती नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यात मूर्ती नेण्या - आणण्याचा लेखी करार केला जातो. राज्यातील नव्हे देशातील हे एकमेव उदाहरण आहे.

मानकऱ्यांमध्ये लेखी करार
श्री खंडोबा व बाणाईचा विवाह नळदुर्ग येथे झाल्याची आख्यायिका असल्यामुळे नळदुर्ग (मैलारपूर) हे खंडोबाच्या भाविकांसाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे.  अणदूर येथील यात्रा बुधवारी (ता. 27) मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक कार्यक्रमांनी पार पडली. बुधवारी रात्री छबिन्याची सांगता होऊन नळदुर्गच्या मानकऱ्यांचे आगमन झाले. अणदूर व नळदुर्ग या दोन्ही गावांच्या मानकऱ्यांमध्ये देवाची मूर्ती नेण्याचा, तसेच आणण्याचा लेखी करार करण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री म्हाळसा, हेगडीप्रधान, मार्तंड भैरव यांच्या मूर्ती नळदुर्गकडे मार्गस्थ झाल्या.

विधिवत पूजा करून मूर्तींची प्रतिष्ठापना
गुरुवारी पहाटे तीन वाजता श्री खंडोबाची मुख्य मूर्ती पालखीतून नळदुर्गकडे मार्गस्थ झाली. पहाटे पाच वाजता मैलारपूर-नळदुर्गमध्ये आगमन झाले. त्यानंतर विधिवत पूजा करून सर्व मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुढील पावणे  दोन महिने श्री खंडोबा मूर्ती मैलारपूर येथे वास्तव्यास असणार आहे. पौष पौर्णिमेस (10 व 11 जानेवारी) यात्रोत्सव साजरा होणार आहे. या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात.


अणदूरच्या श्री खंडोबाची यात्रा २७ नोव्हेंबर रोजी

अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील कुलदैवत श्री खंडोबाची यात्रा येत्या २७  नोव्हेंबर रोजी भरत आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असून यात्रेची जय्यत करण्‍यात येत आहे. 

अणदूरच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ .३० वाजता श्री खंडोबाची महापूजा होईल. दिवसभर भंडारा - खोबरे उधळणे, महानैवेद्य दाखवणे आदी कार्यक्रम पार पडतील. रात्री दहा वाजता श्रीचा छबीना - मिरवणुक काढण्यात येईल. रात्री १२ वाजता नळदुर्गच्या मानकर्यांचे आगमन, त्यानंतर मानपानाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर अणदूर-मैलारपूर(नळदुर्ग) च्या मानकर्यांत खंडोबाची मूळ मूर्ती नेणे व आणण्याचा लेखी करार होईल. मध्यरात्री २.३० वाजता खंडोबाच्या मूर्तीच्या पालखीचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होईल. पहाटे ५ वाजता मैलारपूर (नळदुर्ग) मंदिरात खंडोबाचे आगमन नंतर विधीवत प्रतिष्ठापना केली जाईल.
 
अणदूरच्या यात्रेनिमित्त श्री. खंडोबाच्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे, तसेच भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. श्री खंडोबा मंदिर समिती व श्री खंडोबा यात्रा कमिटी यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहे.
 
श्री खंडोबा आणि बाणाई विवाहस्थळ
श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून खंडोबाची महाराष्ट्रात ८  प्रमुख ठिकाणे आहेत, पैकी अणदूर-मैलारपूर (नळदुर्ग) महत्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते. दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्ग येथे प्रकट झाले, अशी आख्यायिका आहे. श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग जि. उस्मानाबाद येथे झाला होता म्हणून या स्थानाला अन्यन्यसाधारण महत्व आहे,  आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अणदूर व मैलारपूर (नळदुर्ग) या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे असून दोन्ही ठिकाणचे अंतर चार कि.मी. आहे. खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने व मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. अणदूरच्या यात्रेनंतर खंडोबाचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होणार आहे.
 
२८ नोव्हेंबर रोजी कुस्तीचा आखाडा
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबर रोजी कुस्तीचा भव्य आखाडा भरणार आहे, या आखाड्यात महाराष्ट्रातील नामवंत पैलवान हजेरी लावणार असून, ११ हजार ते ५१ हजार बक्षिस ठेवण्यात आले आहे, त्याची जय्यत तयारी सुरु आहे, 
 
 

सुपरफास्ट युगातही कावडीने पाणी आणण्याची प्रथा कायम

अणदूरच्या श्री खंडोबास श्रावण महिन्यात नागझरीचे पाणी

अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील प्रसिध्द देवस्थान श्री खंडोबास संपूर्ण श्रावण महिन्यात नळदुर्गच्या नागझरी झ-याच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.नागझरीचे पाणी माणसाच्या खांद्यावर कावड ठेवून घागरीव्दारे आणण्यात येते.सध्याच्या सुपरफास्ट युगात कावडीने पाणी आणण्याची ही प्रथा अजूनही कायम आहे.यंदाचा मान पुजारी अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे यांना देण्यात आला आहे.


नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यात नळ आणि दमयंती हे राजा - राणी राहत होते.दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा आदीमैलारहून नळदुर्गात प्रकट झाले आणि तिच्याच भक्तीसाठी बाणाईस चंदनपुरीहून नळदुर्गात आणून विवाह केला आणि नंतर जेजुरीस प्रस्थान केले,ही अख्यायिका प्रसिध्द आहे.नंतर नळ राजाने नळदुर्गजवळील बोरी नदीजवळ मंदिर बांधून श्री खंडोबाच्या स्वयंभू मुर्तीची प्रतिष्ठापणा केली.श्री खंडोबाची स्वयंभू मुर्ती नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यातील उपल्या बुरूजाजवळ सापडली आहे.

कालांतराने श्री खंडोबाचे मंदिर अणदूर येथे बांधण्यात आले.नंतर अणदूर आणि नळदुर्गच्या ग्रामस्थात करार होवून श्री खंडोबाची मुर्ती नेण्या आणण्याचा करार झाला.अणदूर आणि नळदुर्ग हे अंतर चार ते साडेचार किलोमीटर आहे.श्री खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावने दोन महिने वास्तव्य असते.दोन्ही ठिकाणी स्वतंत्र मंदिरे असून,देव मात्र एकच आहे.

आगळी वेगळी प्रथा
श्री खंडोबाचे वर्षभर अनेक यात्रा उत्सव असतात.श्रावण महिन्यात एक आगळीवेगळी प्रथा आहे.श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे.श्री खंडोबाच्या मुर्तीखाली महादेवाची पिंड अस्तीत्वात आहे.या पिंडीस आणि श्री खंडोबाच्या मुर्तीस श्रावण महिन्यात नागझरीच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.नागझरी हे मैलारपूर (नळदुर्ग) मंदिराच्या जवळ डोंगर कपारीत आहे.तेथून हे पाणी माणसाच्या खांद्यावर कावड ठेवून घागरीव्दारे भल्या पहाटे आणण्यात येते.

कुठे आहे नागझरी ?
मैलारपूर मंदिरापासून वसंतनगर जाणा-या रस्त्यावर कॅनॉलच्या दक्षिण बाजूस उंच
डोंगरावर नागझरी झरा आहे.या ठिकाणी एक कुंड आहे.या झ-याचे पाणी बारा महिने असते आणि विशेष म्हणजे ते गरम असते.गेली चार वर्षे उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ होता,परंतु या दुष्काळातही या झ-याचे पाणी वाहत होते.हे पाणी अत्यंत शुध्द आणि निर्मळ असून,ते गंगेचे पाणी असल्याची भाविकांची धारणा आहे.


 
असा असतो दिनक्रम
यंदाचा मान अणदूरच्या पुजारी समाजातील अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे यांना देण्यात आलेला आहे.हे दोघे पाहटे तीन वाजता उठून अंघोळ करून धोतर (सोहळे)नेसून प्रत्येकी दोन घागरी (सोबत कावड) घेवून अनवाणी पायी (चप्पल न घालता) चालत निघतात.ते पहाटे चारपर्यंत नागझरीला पोहचतात.तेथे गेल्यानंतर परत अंघोळ करून प्रत्येकी दोन घागरी भरून कावडीने मैलारपूर मंदिरात जातात.तेथील मंदिरातील महादेवाच्या पिंडीस तांब्यातील पाणी घालून ते थेट अणदूरकडे प्रस्थान करतात.एकदा कावड उचलली की ती वाटेत कुठेही टेकावयाची नाही,असा नियम आहे.अणदूरच्या मंदिरात पहाटे साडेपाचपर्यंत ते पायी चालत पोहचतात.

मैलारपूर ते अणदूर हे अंतर चार किलोमीटर आहे.अंधा-या रात्री पावसाची तमा न बाळगता ही कावड आणली जाते.जाण्यायेण्याचे अंतर हे ९ किलोमीटर आहे.हे जिकरीचे काम अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे पार पाडत आहेत.कावडीने पाणी आणणे ही देवाची सेवा असून,ही सेवा करण्यात कसलेही कष्ट जाणवत नसल्याचे अंकुश￰ सुभाष मोकाशे आणि शुभम कालीदास मोकाशे सांगितले.
अणदूरच्या श्री खंडोबाची सकाळी ८ वाजता आणि रात्री ८ वाजता महापुजा होते.या दोन्ही वेळेस श्रावण महिन्यात श्री खंडोबाच्या मुर्तीस नागझरी झ-याच्या पाण्याने अंघोळ घालून अभिषेक केला जातो.इतरही महिन्यातही दोन वेळेस नित्यनियमाने पुजा होते,त्याचा मान माऊली मोकाशे यांना आहे.

खडी रविवार
श्रावण महिन्यात सर्व ठिकाणी सोमवारी उपवास केला जातो,परंतु अणदूरमध्ये रविवारी उपवास केला जातो आणि तो खडी उभा राहून केला जातो.श्री खंडोबाची सकाळी ९ वाजता पुजा आटोपली की,उपवास करणारे उभे राहतात,ते दिवसभर जेवण करत नाहीत,उभे राहूनच फराळ करतात.नंतर रात्रीची पुजा झाल्यानंतर प्रदक्षिणा संपल्यानंतर बसतात.तब्बल बारा तास उभे राहून हा उपवास केला जातो.यास खडी रविवार म्हटला जातो.किमान दीडशे ते दोनशे लोक खडी रविवारचा उपवास करतात.त्याचबरोबर रात्रीच्या पुजेच्या वेळी पुजारी समाजातील प्रत्येक घरातून एका व्यक्तीने सोहळ्यामध्ये येवून श्री खंडोबास पुजेच्या वेळी १०१ बेलपत्र घालण्याची प्रथा आहे.ही प्रथा आजही कायम आहे.

अनादी कालापासून प्रथा
अणदूरच्या श्री खंडोबास श्रावण महिन्यात नागझरीचे पाणी कावडीने आणण्याची प्रथा अनादी कालापासून सुरू आहे.ही प्रथा सध्याच्या सुपरफास्ट युगातही कायम ठेवण्यात आली आहे,असे श्री खंडोबा मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी सांगितले.

श्री खंडोबाचे अणदूरमध्ये आगमन

अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील पावणे दोन महिन्याचे वास्तव्य संपल्यानंतर श्री खंडोबाचे बुधवारी पहाटे अणदूरमध्ये वाजत गाजत आगमन झाले.आता खंडोबाचे सव्वा दहा महिने वास्तव्य अणदूरमध्ये राहणार आहे.
अणदूर आणि नळदुर्गच्या खंडोबाची मूर्ती चल असून, अणदूरमध्ये सव्वा दहा महिने आणि नळदुर्गमध्ये पावणे दोन महिने असा मूर्ती ठेवण्याबाबत लेखी करार आहे.नळदुर्गची पौष पौर्णिमा महायात्रा संपल्यानंतर अष्टमी करून नवमीच्या पूजेला श्री खंडोबा अणदूरमध्ये येतो, त्याप्रमाणे मंगळवारी मध्यरात्री श्री खंडोबा नळदुर्गहून मार्गस्थ झाला होता.
मैलारपूरच्या श्री खंडोबा मंदिरात मंगळवारी रात्री 11 वाजता अणदूर आणि नळदुर्गच्या मानकऱ्याचे आगमन झाले, त्यानंतर सहभोजन झाल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात मानकऱ्याचा मानपान आणि सत्कार करण्यात आला, त्यानंतर मूर्ती नेण्याबाबत आणि आणण्याबाबत लेखी करार करण्यात आला. त्यानंतर म्हाळसा, हेगडी प्रधान, मार्तंड भेरव यांच्या मुर्त्या अणदूरकडे मार्गस्थ झाल्या, त्यानंतर श्री खंडोबाची मुख्य मूर्ती पालखीत घालून हलगीच्या तालावर वारू नाचवत अणदूरकडे मार्गस्थ झाली.
बुधवारी पहाटे चार वाजता पालखीचे वेशीत आगमन झाले, डॉल्बीच्या आवाजात श्री खंडोबाची गाणी, हलगीचा दणदणाट आणि बँडबाजा लावुन मिरवणूक निघाली, समोर फटाक्यांची आतषबाजी आणि वारूचे फटकारे यामुळे वातावरण भक्तिमय आणि प्रसन्नमय झाले होते.
देव परत येणार म्हणून समस्त अणदूरकरांनी भल्या पहाटे उठून आपल्या घरासमोर सडा टाकून रांगोळी काढली होती, तसेच गावातील सुवासिनी महिलांनी पंचारती ओवाळून देवाचे औक्षण केले,मिरवणूक जवळपास दोन तास चालली, पालखी पूर्व महाव्दारसमोर येतात गुरव - पुजारी समाजातील महिलांनी पंचारती ओवाळून देवाचे औक्षण केले, सकाळी सहा वाजता सर्व मूर्तीची अणदूरच्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर सर्व भाविकांना सुनीता ढेपे - बचाटे यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.



नळदुर्गच्या खंडोबा मंदिराचे स्थलांतरे

नळ राजाने नळदुर्ग मध्ये रणमंडल नावाचा किल्ला बांधला..याच नळदुर्ग किल्लातील हे आहे श्री खंडोबाचे पहिले मंदिर !
इब्राहिम आदिलशाहने हे मंदिर पाडून येथे उपली बुरुज बांधला, त्यानंतर नळदुर्गपासून दोन किलोमीटर अंतरावर बोरी नदीच्या काठी मंदिर बांधण्यात आले, मात्र या मंदिरात गायीची हत्या केल्यामुळे मंदिर चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अणदूरमध्ये बांधण्यात आले, छत्रपती शाहू महाराज यांनी मंदिराच्या देखभालीसाठी 500 एकर जमीन दान केली, नंतर अहिल्याबाई होळकर यांनी सभामंडप बांधला, म्हणून अणदूरचे मंदिर तीन टप्प्यात झाल्याचे दिसते,
पुढे नळदुर्ग आणि अणदूरमध्ये देवाच्या मूर्तीसाठी वाद सुरू झाला, त्यानंतर अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्गमध्ये पावणे दोन महिने देवाची मूर्ती ठेवण्याचा करार झाला, तो करार आजही पाळला जातो..
नळदुर्गचे नवे मंदिर बोरी नदीच्या काठावर जुन्या मंदिराच्या 500 मीटर दूर बांधण्यात आले, ते कोरपे नावाच्या भक्तांने बांधले, असा दाखला मिळाला आहे. हे मंदिर बिनशिखराचे होते,सध्याच्या मंदिर समितीचे त्यावर शिखर बांधून रंगरंगोटी केली...

अणदूर आणि नळदुर्ग या दोन्ही मंदिराचे पुजारी एकच असून, ट्रस्ट सुध्दा एकच आहे..
सदानंद आणि होनकळस मोकाशे हे श्री खंडोबाचे मूळ पुजारी, त्यांचे वंशज सध्या पुजारी आहेत, मोकाशेनंतर ढेपे, ढोबळे, येळकोटे, हराळे ही पोटआडनाव पडली आहेत.अणदूरमध्ये दररोज एक पुजारी त्यांच्या हिस्साप्रमाणे बदलतात, नळदुर्गमध्ये मात्र पावणेदोन महिने चार पुजारी एकच असतात, मात्र देव अणदूरला गेल्यानंतर तेथेही हिस्साप्रमाणे रोज पुजारी बदलतात...
जेव्हा देवाची मूर्ती अणदूरला असते तेंव्हा नळदुर्गच्या मंदिरात फक्त शिवलिंग दिसते, तर मूर्ती नळदुर्गला असताना अणदूरच्या मंदिरात फक्त शिवलिंग दिसते...
श्री खंडोबा महादेवाचा अवतार असल्याने मूर्तीच्या खाली शिवलिंग दिसते...
श्री खंडोबाची मूर्तीही एक शिवलिंग असून, त्यावर हळदी चा लेप लावून नाक, डोळे बसविले जातात, त्यावर चांदीचा किरीट चढवला जातो, सकाळ आणि रात्री दोन वेळा सोहळ्यात पूजा केली जाते...रात्री शेजारती म्हटली जाते. .
दोन्ही पूजेच्या वेळी नगारा वाजवला जातो, तो मान मुस्लिम भक्त याकूब शेख कडे आहे, पूर्वी अनेक वर्षे आणखी एक मुस्लिम भक्त बाबू पिंजारी दररोज मंदिरात फुले आणून देत होते...
श्री खंडोबाचे अणदूर आणि नळदुर्गमध्ये वेगवेगळे मानकरी आहेत, यात्रा कमिटी वेगळी आहे...
अणदूर यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवला जातो, नळदुर्ग यात्रेनंतरही कुस्त्यांची स्पर्धा होते...
देव नळदुर्गमध्ये आल्यानंतर दर रविवारी यात्रा तर पौष पौर्णिमेला महायात्रा असते...
- सुनील ढेपे
पुजारी आणि मंदिर समिती सचिव
अणदूर - नळदुर्ग मंदिर
9420477111

चंपाषष्ठी उत्सव आणि मैलारपूर !


चंपाषष्ठी रोजी मल्हारी मार्तंड तथा श्री खंडोबाने मणी आणि मल्ल या राक्षसाचा वध करून जनतेचे आणि ऋषीचे रक्षण केले होते. म्हणून  चंपाषष्ठी सणाला महत्व आहे.
देव दीपावली रोजी श्री महादेवाने  खंडोबाचा अवतार धारण केला आणि चंपाषष्ठी रोजी राक्षसाचा वध केला अशी आख्यायिका आहे. देव दीपावली रोजी ( १९ नोव्हेंबर ) अणदूरची यात्रा पार पडली तर चंपाषष्ठी उत्सव मैलारपूर ( नळदुर्ग) येथे होत आहे. या दिवशी श्री खंडोबाचे दर्शन घेणे अत्यंत पवित्र मानले जाते.
मैलारपूर ( नळदुर्ग) येथे आता दर रविवारी यात्रा भरणार आहे. पहिल्या रविवारी किमान २५ हजार भाविक दर्शन घेतात.जसे रविवार वाढत जातात तशी गर्दी वाढत जाते. तिसऱ्या रविवारपासून किमान ५० हजार ते १ लाख भाविक येतात. पुढे लाखाच्या पुढे भाविक येतात.
२ जानेवारी २०१८ रोजी महायात्रा आहे. या दिवशी पौष पौर्णिमा आहे. यंदा ३१ डिसेंबर रोजी रविवार, १ जानेवारी रोजी अर्धी पौर्णिमा, २ जानेवारी रोजी पौर्णिमा समाप्ती आहे.त्यामुळे ३१ डिसेंबर ते २ जानेवारी पर्यंत किमान १० लाख भाविक दर्शन घेतील, असा अंदाज  आहे.
मैलारपूर ( नळदुर्ग) येथे दर रविवारी मंदिर समितीच्या वतीने मोफत अन्नदान केले जाते. त्याचा लाभ हजारो भाविक घेत असतात. देणाऱ्याचे हात हजार, झोळी माझी फाटकी याप्रमाणे दान देणारे अनेक आहेत.
यंदा पाऊस चांगला झाल्याने पिके चांगली आली आहेत. बोरी धरणाला पाणी ओव्हर फ्लो आहे. बोरी नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे भाविक आनंदी आहेत . जवळच  भुईकोट किल्ला आणि खंडोबाचे दर्शन असा दुग्ध शर्करा योग आहे. मैलारपूर ( नळदुर्ग) क्षेत्र तुळजापूर पासून 35 किलोमीटर आणि सोलापूर पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे.
मैलारपूर ( नळदुर्ग) येथे मंदिर समिती आणि शासनाच्या वतीने अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. बोरी नदीला पायऱ्या, सांस्कृतिक सभागृह, भाविकांसाठी खोल्या बांधण्यात आल्या  आहेत. मंदिराचे रंगकाम करण्यात आले आहे. यंदा आणखी विकास काम पार पडतील, भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून लाकडी आणि लोखंडी बॅरेट  तयार करण्यात आले आहेत.

आख्यायिका
श्री खंडोबा बाणाईसाठी चंदनपुरी ( नाशिक) येथे बारा वर्ष मेंढपाळ म्हणून राहिला,बारा वर्षानंतर जेव्हा श्री खंडोबा मूळ अवतारात आला तेव्हा त्यांनी बाणाईस नळदुर्गमध्ये आणून विवाह केला. नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यात नळ -दमयंती राजा राणी राहत होते, दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्गमध्ये प्रगट झाले आणि तिच्याच भक्तीसाठी बाणाईशी नळदुर्मध्ये विवाह केला आणि नंतर जेजुरीकडे प्रस्थान केले.
अणदूर आणि नळदुर्ग यात चार किलोमीटर अंतर आहे. दोन्ही गावात मंदिरे आहेत मात्र देव एकच आहे. श्री खंडोबा अणदूरमध्ये सव्वा दहा महिने आणि नळदुर्गमध्ये पावणे दोन महिने मुक्कामास असतात, देव एका ठिकाणाहून  दुसऱ्या ठिकाणी नेताना कागदावर लेखी करार केला जातो. गेल्या अनेक वर्षापासून ही  परंपरा सुरु आहे. दोन्ही गावात एकोपा आहे. दोन्ही गावचे वेगवेगळे  मानकरी आहेत.
घोडे, पालखी यांचे मानकरी वेगळे आहेत. वाघ्या- मुरळी अनेक आहेत. मंदिरावर भंडारा आणि खोबरे उधळण्याची परंपरा आहे. येथे पशु हत्येला बंदी आहे. पुरण - पोळीचा नेवेध दाखवला जातो. बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत सोबत पातीचा कांदा हे खंडोबाचे आवडते जेवण आहे.

जुन्या काळात जेव्हा वाहनांची व्यवस्था नव्हती, तेव्हा मैलारपूर ( नळदुर्ग) येथे किमान ७०० ते १५०० बैलगाड्या येत होत्या. किमान सात दिवस यात्रा चालत असे. काळ बदलला आणि त्याची जागा   मोटारसायकल, जीप,कार, टमटम, टेम्पो, ट्र्क यांनी घेतली . यात्रेत किमान ५ किलोमीटर अंतर गर्दी दिसते. यात्रा पळती झाली.जेव्हा वीज नव्हती तेव्हा मशाली पेटवल्या जात होत्या. आता त्याची जागा मर्क्युरी लाइट घेतली आहे.
विद्युत रोषणाईने मंदिर उजाळून निघते. शोभेचे दारूकाम केले जाते. यात्रेत रंगी बेरंगी शोभेची दारू उडवली जाते.

- सुनील ढेपे
7387994411


श्री खंडोबाचे नळदुर्गमध्ये आगमन

उस्मानाबाद - जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री खंडोबाचे अणदूरहुन नळदुर्गमध्ये सोमवारी पहाटे पाच वाजता वाजत गाजत पालखीतुन आगमन झाले. 10 जानेवारी 2018 पर्यंत श्री खंडोबाचे नळदुर्गमध्ये वास्तव्य राहणार आहे.
अणदूरची यात्रा रविवारी मोठया भक्तिभावाने आणि धार्मिक कार्यक्रमानी पार पडली.दिवसभर विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर श्रीचा रात्री 10 वाजता वाजत गाजत छबिना काढण्यात आला. रात्री साडेबारा वाजता छबिण्याची सांगता झाली.
याचवेळी नळदुर्गच्या मानकऱ्याचे आगमन झाले. त्यानंतर पानसुपारी कार्यक्रम पार पडला, त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात अणदूर आणि नळदुर्गच्या मानकऱ्याचा सत्कार करण्यात आला आणि दोन्ही गावाच्या मानकऱ्यामध्ये देवाच्या मुर्त्या नेण्याचा आणि आणण्याचा लेखी करार करण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजता म्हाळसा, हेगडीप्रधान, मार्तंड भैरव यांच्या मुर्त्या नळदुर्गकडे मार्गस्थ झाल्या, त्यानंतर पहाटे तीन वाजता श्री खंडोबाची मुख्य मूर्ती पालखीत घालण्यात आली आणि नळदुर्गकडे मार्गस्थ झाली.
पहाटे पाच वाजता सर्व मूर्त्याचे मैलारपूर - नळदुर्गमध्ये आगमन झाले,त्यानंतर विधिवत पूजा करून सर्व मुर्त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.

नळदुर्गच्या भुईकोट किल्यात श्री खंडोबाची स्वयंभू मूर्ती सापडली असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दोन वेळेस पूजा केली जाते, श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्गमध्ये झाल्याने या मंदिराला जेजुरी इतके महत्व आहे.

यात्रा वाढण्याचे कारण...

तुळजापूर तालुक्यातील अणदूर आणि नळदुर्ग ही दोन वेगवेगळी गावे.दोन्ही गावांत जेमतेम चार किलोमीटर अंतर. सोलापूर - हैद्राबाद हा नॅशनल हायवे चार पदरी होत असून,या दोन्ही गावापासून हा हायवे जात आहे.अणदूरला उड्डाण पूल तर नळदुर्गला बायपास करण्यात येत आहे.जो बायपास आहे,तो श्री खंडोबा मंदिरापासून जात आहे.येत्या दोन वर्षात त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर मैलारपूरच्या मंदिराला आणखी विशेष महत्व येणार आहे.
नळदुर्गचे श्री खंडोबा मंदिर बोरी नदीच्या काठावर बांधण्यात आले आहे.ते नळदुर्गपासून एक किलोमीटर अंतरावर आहे.या ठिकाणी लोकवस्ती नाही.श्री खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूरमध्ये पावणे दोन महिने वास्तव्य असते.यात्रोत्सव मैलारपूरमध्ये श्रीची मुर्ती असताना असतो.दर रविवारी मोठी यात्रा भरते.सलग पाच रविवार झाल्यानंतर पौष पोर्णिमेला महायात्रा भरते.त्यानंतर एक रविवार होतो.अष्टमी करून नवमीला श्री खंडोबाचे अणदूरला प्रस्थान होते.गावे दोन,मंदिरे दोन पण देव एक आहे.दोन्ही मंदिराचे पुजारी एकच असून,ट्रस्ट एकच आहे.जेव्हा अणदूरहून मैलारपूरला आणि मैलारपूरहून अणदूरला देव नेला जातो,तेव्हा दोन्ही गावच्या मानक-यात एक लेखी करार केला जातो आणि मुर्तीची अदानप्रदान केली जाते.मुर्ती एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेताना वाजत गाजत पालखी काढली जाते.हा सोहळा अत्यंत धार्मिक आणि देखणा असतो.
श्री खंडोबा आणि बाणाईचा विवाह नळदुर्गमध्ये झालेला आहे.नळराजाची पत्नी दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्गमध्ये प्रकट झाले आणि तिच्याच भक्तीसाठी याठिकाणी बाणाईशी विवाह केला.श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे.महादेव म्हणजे खंडोबा आणि खंडोबा म्हणजे महादेव.महादेवाने मल्हारी मार्तंण्ड म्हणजे श्री खंडोबा अवतारामध्ये जयाद्रीशी विवाह करण्याचे वचन पार्वतीला दिले होते,त्यामुळे महादेवाने मल्हारी मार्तंण्ड अवतारात बाणाईशी विवाह केला.बाणाई म्हणजे जयाद्री आणि म्हाळसा म्हणजे पार्वती.हेगडी प्रधान म्हणजे विष्णु आहेत.मात्र दिलेल्या वचनाचा त्रास म्हाळसाला झाला.तिला ते सहन झाले नाही,त्यामुळे तिने खंडोबाला वृध्द होण्याचा श्राप दिला.त्यामुळेच श्री खंडोबाने चंदनपुरीत वृध्द होवून बाणाईच्या घरी मेंढपाळ म्हणून बारा वर्षे चाकरी केली.बारा वर्षानंतर म्हाळसाच्या श्रापातून मुक्ती मिळाल्यानंतर श्री खंडोबाने बाणाईला चंदनपुरीतून नळदुर्गात आणून विवाह केला आणि नंतर जेजुरीकडे प्रस्थान केले.त्यामुळेच या स्थानाला मोठे महत्व आहे.ही अख्यायिका फार कमी लोकांना माहीत होती.झी मराठीवरील जय मल्हार मालिकेमुळे ती लोकांसमोर आली.त्याची आम्ही भरपूर प्रसिध्दी केली.त्यामुळे यात्रा वाढली आहे.
श्री खंडोबाची पौष पोर्णिमा यात्रा यंदा रेकॉर्डब्रेक झाली.दर रविवारी मिनी यात्रा भरली.दुष्काळी परिस्थिती असतानाही भाविक मोठ्या संख्येने मैलारपुरात आले.अणदूरला गर्दी वाढली आहे.याचे श्रेय झी मराठीला आणि आम्ही केलेल्या प्रसिध्दीला आहे.
माझ्या सर्व पत्रकार बांधवांनी मला साथ दिली,वृत्तपत्रात सर्व बातम्या आल्या.सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही अनेकाजवळ पोहचलो.चॅनलवर कधी नव्हे बातम्या झळकल्या.त्याचा इम्पॅक्ट आला.यात्रा मोठी होणे आपली संस्कृती आहे.यानिमित्त लोकांना भेटता येते,रोजच्या कटकटीच्या आणि धावपळीच्या जीवनात कुठे तरी मनशांती लाभते.
श्री खंडोबाचा एक पुजारी,मंदिर समितीचा सचिव म्हणून भाविकांची सेवा करणे हे माझे कर्तव्य समजले.जे जे करता येईल,ते करण्याचा प्रयत्न केला.भविष्यात अनेक योजना आहेत,त्या साकार झाल्यानंतर आपणास कळवण्यात येईलच...मैलारपूरची यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी दोन्ही गावचे मानकरी,यात्रा कमिटी,नागरिक,नळदुर्ग नगर परिषद,अणदूर ग्रामपंचायत,पुजारी मंडळ,पोलीस,प्रशासन,पत्रकार या सर्वाचे सहकार्य लाभले.त्या सर्वांचा आभारी आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरची तुळजाभवानीची यात्रा सर्वात मोठी भरते.त्यानंतर येरमाळ्याच्या येडेश्वरीचा नंबर लागतो.आता श्री खंडोबाची यात्राही मोठी होवू लागली आहे.तुळजापूरपासून मैलारपूर आणि अणदूर फक्त ३५ किलोमीटर आहे.सोलापूरपासून ४० किलोमीटर आहे.तुळजापूर,मैलारपूर - अणदूर आणि अक्लककोट हे एकाच मार्गावर आहेत.भाविकांना एकाच वेळी ही तिर्थयात्रा करता येवू शकते...
पुनश्च आभार...




# सुनील ढेपे 
 


9420477111