श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग : संपर्क ७३८७९९४४११ ... Shri Khandoba Devasthan, Andur-Naldurg: Contact 7387994411

चंपाषष्ठी उत्सव आणि मैलारपूर !


चंपाषष्ठी रोजी मल्हारी मार्तंड तथा श्री खंडोबाने मणी आणि मल्ल या राक्षसाचा वध करून जनतेचे आणि ऋषीचे रक्षण केले होते. म्हणून  चंपाषष्ठी सणाला महत्व आहे.
देव दीपावली रोजी श्री महादेवाने  खंडोबाचा अवतार धारण केला आणि चंपाषष्ठी रोजी राक्षसाचा वध केला अशी आख्यायिका आहे. देव दीपावली रोजी ( १९ नोव्हेंबर ) अणदूरची यात्रा पार पडली तर चंपाषष्ठी उत्सव मैलारपूर ( नळदुर्ग) येथे होत आहे. या दिवशी श्री खंडोबाचे दर्शन घेणे अत्यंत पवित्र मानले जाते.
मैलारपूर ( नळदुर्ग) येथे आता दर रविवारी यात्रा भरणार आहे. पहिल्या रविवारी किमान २५ हजार भाविक दर्शन घेतात.जसे रविवार वाढत जातात तशी गर्दी वाढत जाते. तिसऱ्या रविवारपासून किमान ५० हजार ते १ लाख भाविक येतात. पुढे लाखाच्या पुढे भाविक येतात.
२ जानेवारी २०१८ रोजी महायात्रा आहे. या दिवशी पौष पौर्णिमा आहे. यंदा ३१ डिसेंबर रोजी रविवार, १ जानेवारी रोजी अर्धी पौर्णिमा, २ जानेवारी रोजी पौर्णिमा समाप्ती आहे.त्यामुळे ३१ डिसेंबर ते २ जानेवारी पर्यंत किमान १० लाख भाविक दर्शन घेतील, असा अंदाज  आहे.
मैलारपूर ( नळदुर्ग) येथे दर रविवारी मंदिर समितीच्या वतीने मोफत अन्नदान केले जाते. त्याचा लाभ हजारो भाविक घेत असतात. देणाऱ्याचे हात हजार, झोळी माझी फाटकी याप्रमाणे दान देणारे अनेक आहेत.
यंदा पाऊस चांगला झाल्याने पिके चांगली आली आहेत. बोरी धरणाला पाणी ओव्हर फ्लो आहे. बोरी नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे भाविक आनंदी आहेत . जवळच  भुईकोट किल्ला आणि खंडोबाचे दर्शन असा दुग्ध शर्करा योग आहे. मैलारपूर ( नळदुर्ग) क्षेत्र तुळजापूर पासून 35 किलोमीटर आणि सोलापूर पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे.
मैलारपूर ( नळदुर्ग) येथे मंदिर समिती आणि शासनाच्या वतीने अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. बोरी नदीला पायऱ्या, सांस्कृतिक सभागृह, भाविकांसाठी खोल्या बांधण्यात आल्या  आहेत. मंदिराचे रंगकाम करण्यात आले आहे. यंदा आणखी विकास काम पार पडतील, भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून लाकडी आणि लोखंडी बॅरेट  तयार करण्यात आले आहेत.

आख्यायिका
श्री खंडोबा बाणाईसाठी चंदनपुरी ( नाशिक) येथे बारा वर्ष मेंढपाळ म्हणून राहिला,बारा वर्षानंतर जेव्हा श्री खंडोबा मूळ अवतारात आला तेव्हा त्यांनी बाणाईस नळदुर्गमध्ये आणून विवाह केला. नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यात नळ -दमयंती राजा राणी राहत होते, दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्गमध्ये प्रगट झाले आणि तिच्याच भक्तीसाठी बाणाईशी नळदुर्मध्ये विवाह केला आणि नंतर जेजुरीकडे प्रस्थान केले.
अणदूर आणि नळदुर्ग यात चार किलोमीटर अंतर आहे. दोन्ही गावात मंदिरे आहेत मात्र देव एकच आहे. श्री खंडोबा अणदूरमध्ये सव्वा दहा महिने आणि नळदुर्गमध्ये पावणे दोन महिने मुक्कामास असतात, देव एका ठिकाणाहून  दुसऱ्या ठिकाणी नेताना कागदावर लेखी करार केला जातो. गेल्या अनेक वर्षापासून ही  परंपरा सुरु आहे. दोन्ही गावात एकोपा आहे. दोन्ही गावचे वेगवेगळे  मानकरी आहेत.
घोडे, पालखी यांचे मानकरी वेगळे आहेत. वाघ्या- मुरळी अनेक आहेत. मंदिरावर भंडारा आणि खोबरे उधळण्याची परंपरा आहे. येथे पशु हत्येला बंदी आहे. पुरण - पोळीचा नेवेध दाखवला जातो. बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत सोबत पातीचा कांदा हे खंडोबाचे आवडते जेवण आहे.

जुन्या काळात जेव्हा वाहनांची व्यवस्था नव्हती, तेव्हा मैलारपूर ( नळदुर्ग) येथे किमान ७०० ते १५०० बैलगाड्या येत होत्या. किमान सात दिवस यात्रा चालत असे. काळ बदलला आणि त्याची जागा   मोटारसायकल, जीप,कार, टमटम, टेम्पो, ट्र्क यांनी घेतली . यात्रेत किमान ५ किलोमीटर अंतर गर्दी दिसते. यात्रा पळती झाली.जेव्हा वीज नव्हती तेव्हा मशाली पेटवल्या जात होत्या. आता त्याची जागा मर्क्युरी लाइट घेतली आहे.
विद्युत रोषणाईने मंदिर उजाळून निघते. शोभेचे दारूकाम केले जाते. यात्रेत रंगी बेरंगी शोभेची दारू उडवली जाते.

- सुनील ढेपे
7387994411