G-PZND2NBDJ8
श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग : संपर्क ७३८७९९४४११ ... Shri Khandoba Devasthan, Andur-Naldurg: Contact 7387994411

मैलारपूर खंडोबा रविवार यात्रा ( सन 2010 )


मैलारपूर खंडोबा यात्रा ( सन 2010 )


मैलारपूर खंडोबा मंदिर


गाणे ०2 - धनगर वाड्यात घुसला देव.....




गाणे ०१ - जेजुरीच्या खंडेराया....


अणदूर खंडोबा मंदिर





श्री खंडोबाचे मुस्लीम भक्त

अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग ) च्या खंडोबाचे असंख्य हिंदू भक्त आहेत. खंडोबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील अनेक भक्त वर्षातून एकदा तरी दर्शनासाठी येत असतात. पण त्यांचे कोणाला कौतुक वाटत नाही, कौतुक वाटते ते दोन मुस्लीम भक्तांचे. बाबूराव पिंजारी व याकुब शेख अशी त्यांची नावे. बाबूराव पिंजारी यांचे वय 70 च्या पुढे आहे. वयाच्या 30 वर्षापासून ते श्री खंडोबाच्या पुजेसाठी दररोज फुले देत आहेत. सध्या त्यांच्या डोळ्याला दिसत नाही, तरीही त्यांची सेवा कधी चुकलेली नाही.याकूब शेख हे यांचे वय 60 वर्षे असून गेल्या 35 वर्षापासून श्री खंडोबाचा नगारा वाजविण्याचे काम ते करतात. श्री खंडोबाची सकाळी व रात्री अशी दोन वेळा पुजा केली जाते, या दोन्ही वेळी नगारा वाजविण्याचे काम याकूब शेख नित्यनियमाने व चोखपणाने करतात.

श्रीखंडोबा आरती

पंचानन हय वाहन सूर भूषित निळा
खंडा मंडित दंडित दानव अवळीला
मणी मल्ल मर्दूनी तो धूसर पिवळा
करी कंकण बाशिंगे सुमनांच्या माळा
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी
वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll १ ll

सुरवर सत्वर वर दे मजलागी देवा
नाना नामे गाईल हि तुमची सेवा
अघटीत गुण गावया वाटतसे हेवा
फणीवर शिणला तेथे नर पामर केवा
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी
वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll २ ll
रघुवरस्मरणी शंकर हृदयी निवाला
तो हा मल्लांतक अवतार झाला
यालागी आवडे भावे वर्णिला
रामी रामदास जिवलग भेटला
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी
वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll ३ ll

---- रामदास स्वामी

जागरण - गोंधळ

विष्णू कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण व ऋषीगणांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद सुरामध्ये आळवणी केली, अर्थात गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदू धर्मीयांमध्ये गोंधळाची परंपरा सुरु झाली, महाराष्ट्रा मध्ये याची खूप मोठी परंपरा आहे.  विशेषत: तुळजाभवनी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरु झाली.
अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवींची प्रतिमा, गळ्यात कवड्यांची माळ अशा वेशभूषेत आपल्या दारावर आलेली व्यक्ती म्हणजे गोंधळी. अंबेमातेच्या जयजयकार करीत ही व्यक्ती संबळ आणि तुणतुणे या वाद्यांच्या साहाय्याने विविध देवींचे गाणे सादर करतो. संबळाच्या तालावर नृत्यही करतो. त्याला 'संबळ गोंधळ' म्हणतात. तर काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात. ज्याला 'काकडा गोंधळ' असे म्हटले जाते. देवीचा गुणगान गाणारा तो गोंधळी.

आजही कोणत्याही शुभकार्याअगोदर जवळपास सर्व समाजात कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. हा धार्मिकविधी सादर करताना निरनिराळ्या देवतांना गोंधळी गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात. ज्याठिकाणी गोंधळ घालावयाचा आहे त्या ठिकाणी पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून अष्टदल काढले जाते अथवा धान्याच्या राशीवर श्रीफळासह कलश मांडून उसाच्या किंवा ज्वारीच्या पाच ताटांचा मांडव तयार केला जातो व त्याला पुष्प माळा बांधली जाते. याला गोंधळाचा चौक असे म्हणतात. दिवटे पेटवतात, दिवटी हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत आणि नृत्य सादर करतात.गोंधळाची सुरवात आवाहनाने होते, तें असे

तुळजापूर भवानी आई गोंधळाला यावं...
कोल्हापूर अंबाबाई गोंधळाला यावं ...
गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावं ....
कुलस्वामिनी, ग्रामदेवी, आराध्य दैवते अशा सर्व दैवतांना गोंधळावर येण्याचे आवाहन केल्यांनतर देवीचे स्तवन करणारी पदे म्हंटली जातात त्यानंतर देवीचा जोगवा मागितला जातो

अनादी निर्गुण प्रगटली भवानी
मोह महिषासूर मर्दना लागुनी
विविध तापाची करावया झाडणी
भक्ता लागी तू पावसी निर्वाणी
आईचा जोगवा जोगवा.... जोगवा मागीन
गोंधळयांकडे विवध वाद्ये असतात त्यापैकी संबळ हे सर्वात महत्वाचे वाद्य असून त्याच्या सोबतीला तुणतुणे व टाळही असतात. पूर्वीसारखा वेश परिधान करणारे गोंधळी फार थोडेच शिल्लक राहिले आहेत तर आता बदलत्या जमान्याप्रमाणे त्यांचा ही वेश बदलला आहे.

* जागरण

घर तेथे घराणे, घराणे तेथे कुळ, कुल तेथे कुळधर्म कुलाचार हा पाळलाच पाहिजे हा हिंदू संस्कृतीचा रिवाज आहे. कुलस्वामी श्रीखंडेरायाच्या कुलाचारांमध्ये 'जागरण' प्रमुख भाग आहे, जसा देवीच्या कुलाचारातील गोंधळ हा प्रमुख भाग आहे तितकेच महत्व जागरणाला आहे. आज धावपळीच्या जगामध्ये जागरण हा शब्द रात्रभर जागणे यापुरता मर्यादित स्वरुपात पाहिला जातो परंतु जागरण या शब्दाचा अर्थ जागृत करणे होय. आपली आंतरिक शक्ती जागृत करणे, आपला कुलस्वामी जागृत करणे म्हणजे जागरण. आज याच्याकडे लोककला म्हणून पहिले जाते, अनेक लोककलांची जननी म्हणूनही जागरणातील वाघ्या मुरुळी यांच्या कलेकडे बघितले जाते. जागरणाच्या परंपरेविषयी वाघ्या आपल्या कथनातून सांगतो कि पहिले जागरण श्रीकृष्णाने घातले होते म्हणून ते सर्वाना लागू झाले.
जागरणाची मांडणी ही गोंधळा प्रमाणेच असते पाटावर स्वच्छ पीत वस्त्रावर धान्याचे अष्टदल काढून अथवा धान्याची रास करून त्यावर श्रीफळासहित कलश मांडला जातो. उसाच्या अथवा ज्वारीच्या पाच ताटांचा मांडव तयार करून त्यावर पुष्पमाला अड्कविली जाते. विड्याच्या पानावर सुपारी ठेवून या चौकावर खंडोबाचा टाक किंवा मूर्ती मांडली जाते. या चौकासमोर वाघ्या आणि मुरुळी गीत नृत्यामधून कुलस्वामी श्रीखंडेरायाची स्तुती करतात त्याबरोबरच यजमानांसाठी सुख समृद्धी भरभराट व आरोग्य मिळण्यासाठी विनवणी करतात. पुराणातील कथांचा  वर्तमानातील दुष्कृत्यांशी संबंध जोडीत भाविक भक्तांना सोबत घेऊन चालणारा हा धार्मिक विधी म्हणजे मल्हारी कथन, मनोरंजन व प्रबोधन याचा सुंदर मिलाप होय.
या सादरीकरणामध्ये आवाहन, गण, कथन व आरती अशी विभागणी असते तर वाघ्याच्या हातामध्ये डीमडी व मुरुळीच्या हातामध्ये घाटी(घंटी), सोबत करणा-यांकडे टाळ व तुणतुणे असते. जागरणाची सुरुवात करताना सर्व देवतांना चौकावर येण्याचे आवाहन केले जाते......

"जेजुरीच्या खंडेराया जागराला या....या...
पालीच्या तुम्ही गणराया जागराला या....या..."
अशा रितीने आवाहन झाल्यानंतर गण म्हंटला जातो.भाविक भक्तांनी मांडलेल्या जागरण विधीमध्ये वाघ्या मुरुळी भक्तांच्यावतीने मल्हारी मार्तंडाला विनवणी करतात ती अशी

माझिया विनंती मल्हारीला जाऊन सांगा
झोपले असतील देवा व्हावे जागा
देवा रे देवा तुझी सेवा घडली नाही कधी
गुंतलो प्रपंच बेडी मधी
तरुणपण गेले विषयाच्या नादी
त्यातुनी देवा भक्ती मार्ग दावा आधी
देवा तूची खंडोबा तुझा त्रिभुवनी झेंडा
रूप आगळे दिसे पिवळे नाव तुझे प्रचंडा
हातामध्ये सोन्याचा खंडा
हात जोडितो पदर पसरतो देवा येऊ नका रागा
झोपले असतील भक्तांचे देवा व्हावे आता जागा..
त्यानंतर गद्य पद्य मिश्रणातून मल्हार कथा ऐकवली जाते तर सरतेशेवटी आरती केली जाते.

ओवाळू आरती जय खंडेराया
ओवाळी म्हाळसा बानू लागली पाया
कापराच्या ज्योती पंचप्राणाची आरती
ओवाळी म्हाळसा बानू चरणी लागती
फुलाई माळीन देवाला हार घालिती
मालावती मुरुळी गुण आवडीने गाती
काया वाचा म्हणुनी आपला ओवाळीला राया
ओवाळी म्हाळसा बानू लागती पाया
नौखंडात याचे ठाणे शोभे पठारी
येळकोट बोलता भक्त लागले चरणी...

संपूर्ण जागरण हे तीन ते चार तास चालते,
सर्वसाधारणपणे घरामध्ये घडणा-या प्रत्येक शुभकार्याच्यावेळी जागरण गोंधळ करण्याची प्रथा प्रत्येक कुळामध्ये असते. याशिवाय प्रतिवार्षिक किंवा त्रैवार्षिक कुळधर्म कुलाचारावेळी जागरण गोंधळ घातला जातो.

देणा-याचे हात हजार...

चांगले काम केले की, लोक स्वत:हून मदत करतात,श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचा सचिव म्हणून काम करताना याचा अनुभव येत आहे.
अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट हा रिलीजस ट्रस्ट आहे. या ट्रस्टचे सभासद होण्याचा अधिकार फक्त श्री खंडोबाचे हक्कदार पुजा-यांनाच आहे.साधारण 1959 साल असावा. माझे आजोबा दत्तात्रय कोडींबा ढेपे, आप्पाराव तुळशीराम मोकाशे, बाबूराव यशवंत मोकाशे, माणिकराव सखाराम मोकाशे ही त्यावेळीची कर्ती मंडळी. त्यांनी खंडोबा देवस्थानच्या देखभालीसाठी ट्रस्ट स्थापन केला.घटना तयार करताना खरी मदत केली ती विशेष लेखा परिक्षक शंकरराव नाटेकर यांनी. नाटेकर हे अणदूरचे. ते गव्हरमेंटचे मराठवाड्यातील पाच जिल्ह्याचे विशेष लेखा परिक्षक होते.तेच श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या घटनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी तयार केलेल्या घटनेमुळचे आज हा ट्रस्ट पुजा-यांच्या ताब्यात आहे.
पुर्वीच्या काळी ट्रस्टला कसलेही स्वउत्पन्न नव्हते.लाईटची व्यवस्था नव्हती.माझे आजोबा दत्तात्रय ढेपे व गल्लीतील कर्ती मंडळी स्वत:च्या घरातून तेल नेवून देवाला उजेडात ठेवत होते.माझ्या आजोबाच्या निधनांनतर माझे चुलते विश्वनाथ ढेपे सचिव झाले. ते आंतरराष्ट्रीय त्वचा व सौंदर्य तज्ञ डॉ.नितीन ढेपे यांचे वडील होत. चुलते सचिव झाल्यानंतरही बँक खात्यावर ९ रूपये शिल्लक होते.अध्यक्ष प्रकाश मोकाशे, उपाध्यक्ष दिलीप शिवराम मोकाशे, सदस्य रत्नाकर मोकाशे, अशोक मोकाशे, पद्माकर मोकाशे, नवनाथ ढोबळे हे मंडळ १२ वर्षापुर्वी निवडण्यात आले. माझे चुलते विश्वनाथ ढेपे, प्रकाश मोकाशे, रत्नाकर मोकाशे, नवनाथ ढोबळे, पद्माकर मोकाशे हे पेशाने शिक्षक. तर अशोक मोकाशे तलाठी व दिलीप मोकाशे हे वि.का.सोसायटीचे सचिव. सांगण्याचा मुद्दा म्हणजे सर्वजण अनुभवी व वेलशटल मंडळी.या सर्वांनी सेवाभावी वृत्तीने काम सुरू केले.
अणदूरचे मंदिर हेमाडपंथी व पुरातन होते.मंदिराचा बराच भाग पडला होता. सर्वप्रथम मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला.नंतर पुढील सभामंडपावरील नक्षीकाम व मंदिरासह रंगकाम करण्यात आले. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. संपूर्ण मंदिरात फरशी काम करण्यात आले. भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी हौद बांधण्यात आला.तसेच मैलारपूरच्या मंदिरावर शिखर काम करण्यात येवून रंगकाम करण्यात आले. दर रविवारी अन्नदान करण्यासाठी मोठा हॉल बांधण्यात आला. एक वर्षापुर्वी चुलत्यानंतर माझ्यावर सचिव पदाची जबाबदारी पडली. माझ्या कार्यकालात अणदूरच्या मंदिरासमोर पत्र्याचे छत तसेच मंदिर कार्यालयासमोर पत्र्याच्या छताचे काम करण्यात आले. त्याचबरोबर कार्यालयासमोर हॉल टाईप बांधकाम करण्यात येवून फरशीकाम करण्यात आले. जणेकरून भाविकांना थांबण्यासाठी व जेवण्यासाठी व्यवस्था झाली.तसेच मैलारपुरात यंदा अन्नदानासाठी स्वयंपाक करण्यासाठी मोठा हॉल तसेच पिण्याची पाण्यासाठी दीड टँकर पाणी बसेल एवढी टाकी बांध्णयात आली.
त्याचबरोबर मैलारपुरात दर्शनबारी, कठडा वाढविणे आदी कामे पार पडली आहेत.मैलारपूर मंदिराचे यंदा पुन्हा रंगकाम करण्यात आले आहे. मंदिर ट्रस्टने पाठपुरावा केल्यामुळे शासनाच्या पैश्यातून बोरी नदीच्या पात्रावर घाट, सांस्कृतिक सभागृह ( अणदूर व मैलारपूर ) तसेच दोन्ही ठिकाणी शौचालय बांधण्यात आले आहे.
उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे अणदूरचेच रहिवासी.त्यांची खंडोबावर अपार श्रध्दा आहे.त्यांच्या माध्यमातून मैलारपूर मंदिरासाठी नळदुर्गहून व वसंतनगरहून येणारा रस्ता रूंदीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. तसेच मैलारपूरात विजेची स्वतंत्र डीपी मंजूर झाली असून, अंडरग्राऊंड विजेची व्यवस्था मंजूर झाली आहे. यात्रेसाठी मानाच्या काठया येतात.या काठ्यामुळे विजेच्या तारा तुटत असल्यामुळे अंडरग्राऊंड विजेची व्यवस्था मंजूर झाली आहे. पुढील वर्षापर्यंत हे काम पार पडण्याची अपेक्षा आहे.
सध्या मैलारपूरच्या यात्रा उत्सव काळात दर रविवारी अन्नदान मोठ्या प्रमाणात केले जाते. देणारे जास्त व खाणारे कमी आहेत. केवळ भाविकांनी उदार अंत:करणातून दिलेल्या देणग्यामुळेच मंदिराचा विकास होवू शकला. आजपर्यंत देणगी दिलेल्या सर्व भक्तांना माझा मानाचा मुजरा...

*,  श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट
अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग )

अणदूरच्या खंडोबाचा करार

आपण विविध करार वाचले असतील, मग ते देशांदेशात केलेले असो, एकाद्या संवेदनशिल विषयातील असो अथवा दररोजच्या व्यवहारातील असो...पण  एकाद्या देवाचा दरवर्षी लेखी करार केला जातो, हे  कोठे वाचले आहे का ?  निश्चितच नाही... पण महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशात एकाच ठिकाणी हा करार होतो, तेही उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूर या ठिकाणी.
मणी आणि मल्ल या दैत्यांचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी खंडोबाचा अवतार घेतला.या अवतारांतील खंडोबाच्या अनेक कथा प्रसिध्द आहेत.अणदूरच्या खंडोबाचीही अशीच अख्यायिका आहे.अणदूरपासून चार कि.मी.अंतरावर असलेल्या नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यात नळ - दमयंती राजा - राणी राहात होते.दमयंती राणी श्री खंडोबाची निस्सीम भक्त होती.ती दररोज पहाटे उठून स्नान केल्यानंतर श्री खंडोबाच्या दर्शनासाठी आदि - मैलार ( कर्नाटक राज्यातील बीदर या शहरापासून आठ कि.मी.अंतरावर हे ठिकाण आहे) येथे जात होती.तेथे जाण्यासाठी किल्ला परिसरात एक वडाचे झाड मदत करीत होते, त्या झाडाच्या पारंब्यावर बसल्यानंतर हे झाड उडत असे व ते आदि - मैलारपर्यंत जात असे व दर्शन झाल्यानंतर परत हे झाड नळदुर्गला येत असे. नित्यनियमाने एक वर्षे सेवा केल्यानंतर नळ राजाला पहाटे जाग आली तर जवळ दमयंती राणी नव्हती.तोपर्यंत राजाला ही खबर नव्हती.राजाला संशय आला.दुस-या दिवशी त्याने गुपचूप राणीच्या पाठीमागे जावून तोही दुस-या बाजूला पारंब्यावर बसून आदि - मैलारला गेला. तेथे गेल्यावर नळ राजाला सर्व उलघडा झाला व त्याने खंडोबाची माफी मागून नळदुर्गला प्रगट होण्याची विनंती केली, श्री खंडोबाने तथास्तू म्हटले व किल्ल्यातील एक जागा सांगून तेथे आपण प्रकट होणार असल्याचे सुचित केले.नळ राजाने दुस-या दिवशी काही मजूर लावून खंडोबाने दर्शविलेली जागा उकरण्यास सुरूवात केली. ( ती जागा म्हणजे नळदुर्ग किल्ल्यातील उपल्या बुरूजामागील पाठीमागील भाग ) पाच ते सहा फूट खड्डा घेतल्यानंतर रक्ताची चिळकांडी बाहेर पडली. नंतर पाहिले तर एक स्वयंभू तांदळा (दगडाचा अंडाकृती भाग ) निघाला. तो राजाने मोठया भक्तीभावाने पुजला. नंतर किल्ल्यापासून काही अंतरावर श्री खंडोबाचे मंदिर बांधण्यात आले व या ठिकाणी श्री खंडोबाची विधीवत प्रतिष्ठापणा करण्यात आली. दमयंतीच्या भक्तीसाठीच श्री खंडोबा आदि - मैलारहून नळदुर्ग या ठिकाणी प्रगट झाले. राजा - राणीच्या निधनानंतर हजारो वर्षानंतर श्री खंडोबा मंदिरात कोणत्या तरी समाज कंटकाने गाय कापली, त्यामुळे  नळदुर्गचे मंदिर भ्रष्ट झाले.त्यामुळे श्री खंडोबा कोपला म्हणून त्या काळातील लोकांनी पाच कि.मी.अंतरावरील अंनंदऊर या ठिकाणी श्री खंडोबाचे मंदिर बांधले, व श्री खंडोबाचा तांदळा या ठिकाणी नेवून श्री खंडोबाची या ठिकाणी प्रतिष्ठापणा केली. त्याकाळचे अंनंदऊर म्हणजेच आजचे अणदूर होय.
अणदूरच्या श्री खंडोबा मंदिराच्या देखभालीसाठी कोल्हापरच्या शाहू महाराजांनी 500 एकर जमिन दान केली आहे. तसेच अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरासमोर सभागृह बांधले.त्यामुळे अणदूरचे मंदिर तीन वेगवेगळया भागात बांधल्याचे दिसून येते.काही वर्षानंतर नळदुर्गच्या लोकांनी खंडोबा आमचा आहे, असा वाद सुरू केला.या वादावर श्री खंडोबा अणदूर येथे सव्वा दहा महिने व मैलारपूर ( नळदुर्ग ) येथे पावणेदोन महिने ठेवण्याच्या तोडगा निघाला.त्यानुसार मैलारपूर येथे जुन्या मंदिराच्या पाचशे फुटाच्या अलिकडे नविन मंदिर मंदिर बांधण्यात आले व तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली.अनेक वर्षे लोटून गेल्यानंतरही ही प्रथा गुण्या - गोविंदाने सुरू आहे.
दिवसभर यात्रा पार पडल्यानंतर रात्री श्रीचा वाजत- गाजत छबिना काढला जातो.पहाटे दोन वाजता नळदुर्गच्या मानक-यांचे अगमन होते, त्या अगोदरच अणदूरचे मानकरी व ग्रामस्थ जमलेले असतात.दोन्ही गावांच्या मानक-यांत गळाभेट झाल्यानंतर चहा-पान केला जातो.नंतर एका साध्या कागदावर लेखी करार करून तो श्री खंडोबा देवाजवळ एका ताटात ठेवला जातो.त्याच्यावर भंडार टाकून तो मोठ्याने वाचण्यात येतो.आम्ही श्री खंडोबाची मुर्ती पावणे दोन महिन्याच्या वास्तव्यासाठी नळदुर्ग येथे नेत असून तेथील यात्रा पार पडल्यानंतर परत अणदूरला आणून देवू , असा त्यात उल्लेख असतो.नंतर मुख्य मानक-यांचा फेटा बांधून सत्कार केला जातो तर अन्य मानक-यांचा नारळ प्रसाद व फुलांचा तुरा देवून सत्कार केला जातो.त्यानंतर श्री खंडोबाची मुख्य मुर्ती एका पालखीत घालून वाजत - गाजत नळदुर्गला नेली जाते व नळदुर्गची यात्रा संपल्यानंतर वाजत - गाजत अणदूरला परत आणली जाते. हा सोहळा अणदूर - नळदुर्गच्या लोकांचे ऐक्याचे प्रतिक असून, डोळ्याचे पारणे फेडणारा आहे.
अणदूर - मैलारपूरचे एकच पुजारी असून तेच दोन्ही ठिकाणचे पुजा - अर्चा करतात.श्री खंडोबा मंदिर समितीही एकच आहे.मंदिर समितीने भक्तांच्या देणग्यांवर दोन्ही ठिकाणच्या मंदिराचा जिर्णोध्दार केला आहे. मैलारपूर येथे दर्शन बारी, अन्नदानासाठी सभागृह, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत तसेच  यात्राकाळात भाविकांना थांबण्यासाठी मंदिर परिसरातील खासगी शेतीही विकत घेतली आहे. मैलारपूर येथे दर रविवारी अन्नदान मोठया प्रमाणात केले जाते.पुर्वीपेक्षा मंदिर समितीने विकासाची कास धरली आहे.
* सुनील ढेपे
 मो.९४२०४७७१११
 dhepesm@gmail.com