आज एका अनोख्या आणि श्रद्धापूर्ण सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा योग आला आहे. श्री खंडोबाची मूर्ती आज मैलारपूर (नळदुर्ग) येथून अणदूरकडे प्रस्थान करीत आहे. ही घटना केवळ धार्मिक स्थलांतर नसून, दोन गावांमधील एकात्मता, भक्ती आणि परंपरेचे प्रतीक आहे.
श्री खंडोबा सव्वादहा महिने अणदूर येथे आणि पावणे दोन महिने मैलारपूर (नळदुर्ग) येथे वास्तव्य करतात. मार्गशीर्ष प्रतिपदा रोजी अणदूर येथे श्री खंडोबाची यात्रा असते आणि चंपाषष्टी उत्सवाकरिता मूर्ती मैलारपूर (नळदुर्ग) येथे नेली जाते. पौष पौर्णिमा यात्रा संपल्यानंतर नवमीच्या पूजेला मूर्ती पुन्हा अणदूरला आणली जाते.
मूर्तीचे हे स्थलांतर करताना दोन्ही गावांमधील मानकऱ्यांमध्ये एक लेखी करार केला जातो. त्यानंतर पालखीतून वाजत गाजत मूर्तीची मिरवणूक निघते. गावे दोन, मंदिर दोन आणि मूर्ती एक अशी ही आगळीवेगळी प्रथा महाराष्ट्रात फक्त अणदूर-मैलारपूर (नळदुर्ग) येथेच पहावयास मिळते.
मैलारपूर (नळदुर्ग) येथे श्री खंडोबा असताना दर रविवारी मिनी यात्रा भरते आणि पौष पौर्णिमेला महायात्रा भरते. या महायात्रेत जवळपास पाच लाख भाविक सहभागी होतात. एक हजार नंदीध्वज (काठ्या) येथे आणल्या जातात, त्यामध्ये मानाच्या काठ्या अणदूर आणि नळदुर्गच्या असतात. या निमित्ताने शोभेचे दारूकाम केले जाते.
श्री खंडोबाचे अणदूरकडे प्रस्थान ही केवळ एक धार्मिक घटना नसून, दोन गावांमधील एकोपा, भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक आहे. ही प्रथा आपल्याला सामाजिक ऐक्याचे आणि सहिष्णुतेचे महत्व अधोरेखित करते.
- सुनील ढेपे , सचिव
श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - मैलारपूर (नळदुर्ग)
मो. ७३८७९९४४११